काही (म्हणजे १२) वर्षापूर्वी मी टाईमपास मध्ये करीअर करत असताना एक दिवस एक शेतकरी न धुतलेल्या भुईमुगाच्या शेंगा विकत होता. शेजारीच एकजण धुतलेल्या. सर्वजण शहरी लोक धुतलेल्या विकत घेत असताना मी मात्र अ(व)धूत घेतल्या कारण माझे लक्ष त्या भुईमुगांकडे नव्हते तर त्यांना चिकटलेल्या सुपिक मातीकडे…. त्या शेतकऱ्यालाही आनंद जाहला कारण मी त्याच्या सर्व शेंगा घेऊन टाकल्या. अर्थात घरच्या शहाण्यांनी आमची शतशब्दी सेवा केलीच पण…
नंतर मी त्या घरी सर्व शेंगा स्वच्छ धुतल्या व त्यातून मिळालेल्या मातीत मला आईने दिलेले गोकर्णीचे बीज लावले. त्याला गोकर्णीचा छान वेल तर आलाच पण परमेश्वर (सृष्टी) कृपेने एक भुईमुगाचेही रोपटे सुद्धा आले… आणि मला मनस्वी आनंद झाला…
आता मला सांगा की सर्व कारखाने काढायला सुपिक जमीनच का लागते? बाबा आमटेंना सरकारने कोणती जमीन दिली होती? तर सूर्य आणि चांदण्यानो (बंधु आणि भगिनींचे शहरी टोपणनांव काय ते), सर्व शहरी महाभाग्यवंत धुतलेल्या भाज्या विकत घेतात आणि झाडे (होय, माती विकत आणून तयार केलेल्या बगिचालाच टेरेस गार्डन म्हणतात) लावायला कुंडीत पाहिजे म्हणून माती विकत घेतात…
सध्या मात्र आम्हीं सेंद्रीय माती तयार करणे हाच मोकळ्या वेळेचा मुद्योग (मुक्तमनी सुरु केलेला उद्योग) करतो घरच्या वेळांत वेळ काढून… त्याची उत्पादकृती सर्व उत्तम शहरी शैक्षणिक संस्थामध्ये अभ्यासक्रमाचाच एक भाग म्हणून शिकवले जाते!
॥हरिः ॐ॥
